Skip to main content
आई गेली... पण लेक-जावयांसाठी आजही उघडेच आहेत मायेचे माहेर!• पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी रुजविलेली अधिक मासाची परंपरा• ममता बाल सदनात 7 जूनला "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान"भावनिक सोहळा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्वतःच्याच आयुष्यात पेक्षा, भूक आणि संघर्षाचे असंख्य चटके सोसलेल्या एका आईने हजारो अनाथ मुलांच्या आयुष्यात मायेचा दिवा पेटवला. जिच्या पदरात दुःखच दुःख आले, त्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी मात्र आपल्या मुलींच्या वाट्याला आनंद, सन्मान आणि माहेरची ऊब यावी यासाठी आयुष्य वेचले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या मायेचा ओलावा अजूनही जिवंत आहे. याच मायेचे दर्शन पुन्हा एकदा रविवार, दि. ७ जून रोजी "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान" भावनिक सोहळ्यात होणार आहे. ममता बाल सदन, कुंभारवळण (सासवड, ता. पुरंदर) येथे होणार आहे.१९९२ साली माईंनी स्थापन केलेल्या या संस्थेत आजही अनाथ, निराधार, निराश्रित आणि गरजू मुलींचे संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनाचे कार्य सुरू आहे. सध्या ८० मुली येथे शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, आजपर्यंत तब्बल २२० मुलींची थाटामाटात लग्ने लावून त्यांना संसारात स्थिर करण्यात आले आहे. त्यामुळे आज माईंच्या कुटुंबात २२० लेक-जावई आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात माहेरवाशिणींना सन्मानाने बोलावून वाण देण्याची परंपरा आहे. मात्र आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींना माहेर कुठले? हा प्रश्न माईंना कायम अस्वस्थ करायचा. म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थेतून संसारात गेलेल्या मुलींना अधिक मासात सन्मानाने बोलावून त्यांना माहेरची माया देण्याची अनोखी परंपरा सुरू केली.यावर्षीही "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान" या संकल्पनेतून लेकी व जावयांना संस्थेत निमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी जावयांना नवीन पोशाख, तर लेकींना साडी-चोळी, जोडवे, तामणदीप, निरंजन,३३ अनारसे आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे उपस्थित असलेली प्रत्येक मुलगी स्वतःला अनाथ समजत नाही. कारण माईंनी त्यांना केवळ आसरा दिला नाही, तर आई-वडिलांचे प्रेम दिले. त्यांच्या विवाहानंतरही हे नाते तुटले नाही. उलट प्रत्येक अधिक मासात हे माहेर पुन्हा उघडते आणि लेकी-जावयांच्या स्वागताने संस्था आनंदाने फुलून जाते. "आपल्याला आई-वडील नाहीत, आपल्याला विचारणारे कोणी नाही, असा विचार या मुलींच्या मनात कधीच येऊ नये, हीच माईंची शिकवण आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत," असे पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र व ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनी सांगितले."प्रत्येक वडील अधिक मासात आपल्या लेकीला सन्मानाने माहेरी बोलावतो. आम्हीही माईंच्या प्रत्येक लेकीला तितक्याच प्रेमाने बोलावतो. समाजातील दानशूर व्यक्ती, मान्यवर आणि संवेदनशील नागरिकांनी या मुलींचे पालक म्हणून उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद द्यावेत," असे आवाहनही त्यांनी केले. आजच्या धावपळीच्या आणि नातेसंबंध दुरावत चाललेल्या काळात, आई गेल्यानंतरही तिच्या मायेची परंपरा जिवंत ठेवणारे हे चित्र विरळच म्हणावे लागेल. माईंच्या स्मृती, त्यांच्या संस्कारांचा वारसा आणि शेकडो लेकींच्या डोळ्यात दाटलेले माहेरपण यांचा संगम असलेला हा अधिक मास सोहळा अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरणार आहे.बॉक्सलेक-जावयांसाठी विदर्भाच्या पुरणपोळीची खास मेजवानीअधिक मास सोहळ्यानिमित्त सुमारे 800 जणांसाठी विदर्भाच्या पारंपरिक पुरणपोळीच्या भोजनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. पुरणपोळीसोबत दूध, आमटी-भात, कुरडई, पापड आदी पारंपरिक पदार्थांची रेलचेल असणार आहे. माईंच्या प्रत्येक लेक-जावयाचा मानपानाने सत्कार व्हावा यासाठी संस्थेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. माहेरच्या प्रेमाची ऊब आणि आदरातिथ्याची परंपरा जपत आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment