Skip to main content
“ज्ञान, संवेदनशीलता व अंमलबजावणी महत्त्वाची” — डॉ. मनोहर चासकर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे इंग्रजी, वाणिज्य आणि रसायनशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. शैक्षणिक, संशोधनात्मक आणि बौद्धिक देवाणघेवाणीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या परिषदांचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले.उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. मनोहर चासकर यांनी जागतिक स्तरावर संशोधनाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात संशोधन ही केवळ शैक्षणिक आवश्यकता नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषी विचार, कौशल्याधारित शिक्षण आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी अध्यापकांनी मार्गदर्शक, प्रेरक आणि संशोधन सुलभ करणारे घटक म्हणून कार्य केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेल्फ-फंडेड चर्चासत्रामागील संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अशा परिषदेमुळे महाविद्यालयीन पातळीवर शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागते तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय आणि संवाद अधिक दृढ होतो. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन आणि सर्जनशीलतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.इंग्रजी विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांनी परिषद आयोजनाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना, “Literature, Culture and Society: Emerging Trends in English Studies”, “Innovation and Sustainability in Commerce and Management in the Digital Era” आणि “Frontiers in Sustainable and Advanced Chemical Sciences” या विषयांमधील संशोधनाच्या नव्या दिशा अधोरेखित केल्या. त्यांनी सांगितले की, अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे विविध क्षेत्रांतील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी एकाच व्यासपीठावर येतात, ज्यामुळे ज्ञानवृद्धीबरोबरच नवीन संकल्पनांचा विकास होतो.या प्रसंगी मराठी विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र “एकविसाव्या शतकातील साहित्य अभिव्यक्ती: अभ्यास आणि संशोधन” या विषयावरील प्रोसिडिंगचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशनामुळे संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत उपलब्ध झाला आहे.या आंतरराष्ट्रीय परिषदेस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 400 पेक्षा अधिक प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. विविध तांत्रिक सत्रांमध्ये संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले, ज्यातून नव्या कल्पना, दृष्टिकोन आणि संशोधनाच्या संधी उलगडून आल्या.एकूणच, या परिषदेमुळे शैक्षणिक क्षेत्रात नवे क्षितिज उघडले गेले असून, संशोधन, नवोन्मेष आणि ज्ञानवृद्धीला चालना मिळाल्याचे समाधान सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आले. या परिषदेचे आयोजन वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे समन्वयक डॉ. विजय पुणेकर, डॉ. किशोर लिपारे, डॉ. नरेंद्र कांबळे यांनी केले होते. या प्रसंगी IQAC चे समन्वयक डॉ. बजरंग शिंदे, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, उपप्राचार्य डॉ. बी. यु. माने, वाणिज्य विभाग समन्वयक डॉ. नरसिंग गिरी, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शितल कलापुरे, डॉ. मदभावीकर आणि डॉ. विशाखा गणवीर यांनी प्रभावीपणे केले.. शेवटी डॉ. नरसिंग गिरी यांनी सर्व मान्यवर, सहभागी आणि आयोजन समितीचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.फोटो कॅप्शन उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. मनोहर चासकर व उपस्थित मान्यवर
Popular posts from this blog
Comments
Post a Comment