Skip to main content
पुरंदर विमानतळ प्रकल्प: जमीन संपादनासाठी विशेष मोहीम; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पासाठीची जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली असून, बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रक्रियेचा आढावा घेतला असून, जमीन संपादनाचे काम पारदर्शकपणे आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.विमानतळ प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना अनेक तांत्रिक प्रश्न उद्भवत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून दर सोमवारी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे, ज्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेमुळे आतापर्यंत सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे मोबदले वाटप करण्यात आले असून, १५ जुलैपर्यंत जमिनीच्या मोबदल्याचे ५० टक्के वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निश्चित केले आहे.प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, जमिनीच्या मूळ मूल्यावर १० टक्के मोबदला कपातीचे नियम स्पष्ट असले तरी, प्रत्यक्ष जमिनीच्या विकासामुळे बाधित शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा मिळावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी 'शेवटपर्यंत काहीही देऊ नका, शेवटी जास्त पैसे मिळतील' अशा अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे कोठात अडकून न पडता, ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यावर प्रशासनाचा भर आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे की, जमिनीचे मूल्यमापन करताना सर्व नियमांचे पालन केले जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच, अफवांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांनी प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment